Thursday 21 September 2017

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र - प्रा. अशोक चौसाळकर



कोल्हापूर दि.20 सप्टेंबर - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.
          शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग आणि सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमालेत ''संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वरूप फलश्रुती'' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अरुण भोसले होते.
      प्रा.चौसाळकर म्हणाले, 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' ही तमाम मराठी भाषिकांनी जात, धर्म, पंथ, इ. भेद विसरून लढवलेली चळवळ होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने शेकाप किंवा कम्युनिस्ट पक्षासारख्या डाव्या पक्षांनी मोठे योगदान दिलेले आहे. सेनापती बापट, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, नानासाहेब गोरे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी अत्यंत संयमाने ही चळवळ हाताळली. त्यामुळे काही अपवाद वगळता यामध्ये फार मोठा हिंसाचार किंवा दंगे - धोपे घडले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोक देखील मोठया संख्येने होते. शाहीर अमरशेख अण्णाभाऊ साठे, गवाणकरांच्या कलापथकानेही या लढयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. संयुक्त महाराष्ट्र समितीची ताकद वाढविण्यामध्ये डॉ. आंबेडकरांच्या शेडयूल कास्ट फेडरेशनची फार महत्त्वाची भूमिका होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अरूण भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे जितके श्रेय संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेल्या चळवळीचे आहे तितकेच श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणातील मुत्सदेगीरीला दयावे लागेल.
इतिहास विभागप्रमुख सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. नंदा पारेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस कै. प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. डॉ. अवनीश पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर श्री अविनाश भाले यांनी आभार मानले.
व्याख्यानासाठी सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठाता प्रा. भारती पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार, प्रा. रविंद्र भणगे, प्रा. शिवाजी जाधव, श्री. सुरेश शिपुरकर, डॉ. निलांबरी जगताप, प्रा. य. ना. कदम, इ. मान्यवर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी डॉ. किशोर खिलारे, श्री. उमेश भोसले, श्री. शरद पाटील यांनी परिश्रम घेतले.
------

No comments:

Post a Comment