Tuesday 18 October 2016

कॉ. दत्ता देशमुख अत्यंत तेजस्वी, लढाऊ नेते: डॉ. एन.डी. पाटील






कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: कॉ. दत्ता देशमुख हे एक अत्यंत तेजस्वी, लढाऊ आणि हिम्मतबाज नेतृत्व होते. या अलौकिक व्यक्तित्वाच्या विविध पैलूंची नव्या पिढीला ओळख करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील प्रस्तावित कॉ. दत्ता देशमुख अध्यासनासाठी एस.एम.ई. वर्कर्स फेडरेशन आणि स्वाभिमानी वीज कामगार या मुखपत्राकडून दहा लाख रुपयांचा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम गणितशास्त्र अधिविभागात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कॉ. दत्ता देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. पाटील म्हणाले, कॉ. देशमुख यांची काम करण्याची पद्धत अत्यंत झंझावाती होती. एक लढवय्या कामगार नेते असण्याबरोबरच अत्यंत अभ्यासू वृत्ती त्यांच्यात होती. त्या बळावरच त्यांनी कृषी आणि सिंचनाच्या संदर्भातही महाराष्ट्राला मोलाचे योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र लढा असो, दुष्काळ निर्मूलन समितीवरील कामकाज असो, साऱ्याच बाबतीत त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा राहिला. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी उभारलेला उसाच्या किंमतीसाठीचा संघर्ष आणि आजच्या परिस्थितीतील त्याच प्रकारचे लढे यांच्यात अत्यंत गुणात्मक फरक असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या मर्यादांतून बाहेर पडून पूर्णतः कामगार व सामाजिक चळवळीला त्यांनी वाहून घेतले.
यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी दत्ता देशमुख यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कायद्याखाली केलेली स्थानबद्धता आणि त्यानंतर घडलेल्या विविध राजकीय घडामोडींची अत्यंत रंजक माहितीही डॉ. पाटील यांनी या वेळी दिली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांना लहानपणापासूनच त्यांच्या आईकडून दातृत्वाचे संस्कार लाभले. स्वतःची परिस्थिती अत्यंत खडतर असतानाही इतरांना मदत करण्याचा गुण त्यांनी आपल्या आईकडून घेतला. हे दातृत्व त्यांनी आयुष्यभर जोपासले. प्रत्यक्ष शिक्षक नसले तरी त्यांनी शिक्षकाचा पिंड सदोदित जोपासला. जनसामान्यांचा कळवळा असणारा एक द्रष्टा पुढारी, कृतीशील शेतकरी, अभ्यासू समाजचिंतक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तीमत्त्वात दडलेले होते. प्रस्तावित अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, विविध समाजघटकांशी संवाद प्रस्थापित करणे आणि त्यांच्या हिताचे कार्यक्रम राबविणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असते. त्याची पूर्तता करणारे कॉ. दत्ता देशमुख अध्यासन आहे. त्यांच्यामुळेच आज विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने वीज कर्मचारी प्रथमच आले, ही मोठी उपलब्धी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अध्यासनाचा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांनी केलेल्या त्याग व त्यामागील भावना ही आजच्या पिढीसमोर मांडण्याची नितातं गरज निर्माण झाली आहे. सुजाण समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित अध्यासन उपयुक्त ठरेल. नागपूर विद्यापीठातही कॉ. ए.बी. वर्धन यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. एन.डी. पाटील यांच्या हस्ते प्रस्तावित अध्यासनासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश आणि कॉ. दत्ता देशमुख यांची प्रतिमा कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. स्वाभिमानी वीज कामगारचे संपादक सुरेश परचुरे यांनी प्रास्ताविक केले, तर वीज कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विनय कोटी यांनी आभार मानले.

Friday 14 October 2016

वाचनातूनच समाज परिवर्तनाची प्रेरणा: डॉ.भीमराव गस्ती



Dr. Bhimrao Gasti
कोल्हापूर, दि.14 ऑक्टोबर: समाज परिवर्तनासाठीची प्रेरणा थोर साहित्यिकांच्या पुस्तकांचे वाचन केल्यानेच मिळाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमात ते बोलत होते. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे अध्यक्षस्थानी होते.
डॉ.भीमराव गस्ती म्हणाले, मी कानडी असून मराठी माध्यमातून शिक्षण घेत गेलो.  मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तके दहावीपर्यंत वाचून काढली. मी शिकलो, म्हणून साहित्यिक झालो. माणसांमध्ये मोजल्या जात नसलेल्या लोकांसाठी करीत असलेली चळवळ पाहून मला शंकरराव खरात, नानासाहेब गोरे यांनी लिखाण करण्यासाठी प्रेरित केले. माझ्या लिखाणाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषा येत असल्यामुळे समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याचा उपयोग होत गेला. चळवळीमध्ये कार्य करताना ज्या- त्या ठिकाणी त्यांच्यासारखाच फाटका राहून माझे कार्य करीत गेलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास वाढत गेला आणि चळवळ वाढत गेली. चळवळ उभी करताना स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळवून देता आले त्यामुळे लोक एकत्र येत गेले. 
सामाजिक परिवर्तनाची चळवळ एका माणसाकडून होत नाही, त्यासाठी इतरांचे सहकार्याचे हात आवश्यक असतात, असे सांगून डॉ. गस्ती म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटका बेरड, बेडर, रामोशी समाजासह इतर जाती-जमातीमधील देवदासींसाठी कार्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या अत्याचारामुळे माझ्या कुटुंबातील चौदा माणसे मारली गेली. पोलीसांकडून इतर समाजातील लोकांवर लाठीमार झाला तरी मोठी बातमी होत असे. परंतु, या समाजावर गोळीबार झाला, तरी कुठे चर्चाही होत नव्हती. आज याच समाजातील लोक शिक्षणामुळे उच्चविद्याविभूषित हो डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस अधिकारी, शिक्षक, आयएएस, आयपीएस अधिकारी एकवीस आमदार झालेले आहेत.  या चळवळीने समाजातील लोकांना पुढे नेण्याचे काम केले. आमची चळवळ प्रश्नांभोवती फिरते, त्यामुळे मार्ग काढणे शक्य होते.
स्वातंत्र्यपूर्व नंतरच्या काळात बेरड, बेडर, रामोशी समाजावरील अत्याचाराबाबत डॉ.गस्ती म्हणाले, शाळे एखादी चोरी झाली, तरी शिक्षक विद्यार्थी मलाच मारत. त्याही परिस्थितीत शाळेत पहिला क्रमांक घेणे कधीही सोडले नाही. पुढे आंध्र, वारंगळ या ठिकाणी प्री-डिग्रीसाठी प्रवेश घेतला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्य वाचले. विद्यापीठामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आल्यामुळे मला रशियामध्ये पीएच.डी.साठी जाण्याची संधी मिळाली. पुस्तकांच्या वाचनाने मन उल्हासित होवून नवे मार्ग दिसतात. वयाच्या 24-25 व्या वर्षी हिंडालचा लढा दे परकीय लोकांचा कारखाना बंद पाडला. देवदासींच्या मुलांसाठीचे देशातील पहिले वसतिगृह गडहिंग्लजमध्ये चळवळीच्या माध्यमातून निर्माण झाले. आपले दु:ख इतरांनी सोडविण्याची अपेक्षा ठेवता स्वत: त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नये, त्यामुळे निराशा येत नाही, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे म्हणाले, आत्मविश्वास प्रज्वलीत ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे वाचन करणे आवश्यक आहे.  वाचन दिन साजरा कराव लागतो, ही बाब तरुण पिढीने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपले उत्तम मत व्यक्त करण्यासाठी वाचनाची आवड असणे आवश्यक आहे.  तंत्रशिक्षणातील क्रांतीमुळे घरातील सर्वांचा संवाद तुटून गेला. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग एकत्र आलेले आहे, अशा वेळेस मनामनामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्याची गरज आहे.
ग्रंथपाल डॉ.नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभागप्रमुख प्रा.राजन गवस यांनी परिचय करून दिला. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी आभार मानले. भाग्यश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिविभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.