Monday 6 June 2016

'ग्यान'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ज्ञानाची देवाणघेवाण गतिमान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील


शिवाजी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रमाचे डिजीटल उद्घाटन करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. शेजारी (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, प्रभारीक लुसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर.मोरे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे आणि डॉ. आर.के. कामत.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील नूतन कार्यशाळेचे उद्घाटन करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील नूतन कार्यशाळेतील यंत्रांची पाहणी करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. 


शिवाजी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रम, तंत्रज्ञान अधिविभाग वर्कशॉपचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. ६ जून: शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या 'ग्यान' (ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स) उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञानाच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया गतिमान होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत 'ग्यान' उपक्रमाचे तसेच तंत्रज्ञान अधिविभागाच्या नूतन वर्कशॉपचे आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, 'ग्यान' समन्वयक डॉ. आर.के. कामत, संयोजक डॉ. पी.डी. राऊत होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठाने 'जीआयएस प्रणाली आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन' हा 'ग्यान'च्या प्रथम सत्रासाठी निवडलेला विषयही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या हा विषय महाराष्ट्र शासनाच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे. पर्जन्यमान कमी-अधिक असणे ही बाब आपल्या हातात नसली, तरी पाऊस जमिनीत जिरवणे हे निश्चितपणे आपण करू शकतो. या सात दिवसांच्या अभ्यासक्रमात या विषयावर अत्यंत उपयुक्त चर्चा होईल, अशी आशा आहेच. पण, विद्यापीठाने एवढ्यावरच न थांबता पाण्याचे नियोजन या विषयाचा सर्वंकष अभ्यास करणारा स्वतंत्र विभाग किंवा यंत्रणा उभी करावी आणि शासनाला त्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनाची मोहीम अत्यंत गांभीर्यपूर्वक हाती घेतली असून गेल्या वर्षभरात राज्यातल्या ६,५०० गावांत एक लाखांहून अधिक पाणी साठवण क्षेत्रे विकसित केली केली आहेत. अशा प्रकारे पाच वर्षांत सुमारे ३२,५०० गावांपर्यंत ही मोहीम शासन राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. मेरवाडे यांनी सांगितली जलस्रोत माहिती व्यवस्थापनाची चतुःसूत्री
या प्रसंगी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांचे 'भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) व जलस्रोतांचे व्यवस्थापन' या विषयावर बीजभाषण झाले. पुढील आठवडाभर ते 'ग्यान' उपक्रमांतर्गत विद्यापीठात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. ते म्हणाले, पाणी प्रश्नाविषयी चर्चा करीत असताना विविध स्रोतांच्या माध्यमातून आपल्याकडे नेमके किती पाणी उपलब्ध आहे, याची माहिती असणे अनिवार्य आहे. त्याखेरीज त्यांचे व्यवस्थापन अशक्य आहे. तालुक्यापासून ते देश आणि खंड अशी ही व्याप्ती वाढत जाईल, तितकी या माहितीची अनिवार्यता वाढत जाते. पर्यावरणीय बदल आणि जमिनीच्या वापरातील बदल या दोन बाबींमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन अधिक जिकीरीचे बनत आहे. कोणत्याही विभागातील जलप्रवाहांकडे पाहून त्या-त्या परिसरातील पाण्याच्या एकूण अवस्थेचा अंदाज येत असतो. याच आधारावर संबंधित प्रवाहांचे, स्रोतांचे संगणकीय सिम्युलेशन मॉडेल तयार करण्यात येते. आणि त्या आधारे त्यांच्या व्यवस्थापनाचे नियोजन करता येऊ शकते. मात्र त्यासाठी हार्ड इन्फ्रास्ट्रक्टर, सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक व अद्यावत डाटा सिम्युलेशन व नॉलेज शेअरिंग ही चतुःसूत्री अत्यंत कळीची भूमिका बजावते. जितका अद्यावत व गतिमान डाटा उपलब्ध होईल, तितकी त्यासंदर्भातील अनिश्चितता आपल्याला कमी करता येऊ शकते आणि जास्तीत जास्त अचूक, वस्तुनिष्ठ माहिती देता येऊ शकते.
पाण्याच्या संदर्भातील अनेक एजन्सी देशपातळीवर कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्याबरोबरच समाजमाध्यमांच्या सहाय्यानेही पाण्याच्या माहितीचे संकलन व आदान प्रदान आता 'हायड्रो-शेअर'सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाने राबविलेल्या विविध विद्यार्थीभिमुख योजना, उपक्रमांची तसेच राष्ट्रीय उपक्रमांत विद्यापीठाने दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, केवळ विद्यापीठ स्तरावरच नव्हे, तर महाविद्यालयीन स्तरावरही संशोधनास चालना देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी 'रिसर्च सेन्सिटायझेशन ग्रँट' घोषित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे कोणतीही फेलोशीप नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'रिसर्च स्टुडंट फायनान्शियल असिस्टंन्स' योजना विद्यापीठाने घोषित केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर 'बेस्ट रिसर्चर' पुरस्कार देण्याचेही विद्यापीठाने ठरविले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये इस्रोच्या 'INRSS' उपग्रह मालिकेतील संदेशग्रहण करणारा रिसिव्हर स्थापित करण्यात आला आहे. अशी सुविधा उपलब्ध असणारे आणि या उपक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव अकृषी विद्यापीठ आहे.
शिवाजी विद्यापीठास सात दिवसाच्या विक्रमी वेळेमध्ये सात आंतरराष्ट्रीय ग्यान कोर्सेस मंजूर झाले असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, IIT, IIM, IISCR या नामांकित शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने शिवाजी विद्यापीठ हे प्रकल्प मिळविण्यात यशस्वी झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षा जगाच्या कानाकोपऱ्यातून सात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, शिक्षक शिवाजी विद्यापीठात येऊन येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांच्याबरोबरच  मेकॅट्रॉनिक्ससारख्या प्रगत विषयावर ए.आय.टी., थायलंड येथील डॉ.पर्चीकून, 'अठराव्या शतकातील दख्खन' या मराठा इतिहासासंबंधीच्या विषयावर मिशीगन येथील प्रा.गॉर्डन, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा परदेशात कशी शिकवावी, यासंबंधी इटलीच्या डॉ.कॉन्सोलारो, पश्चिम घाटातील जैवविविधतेविषयी रशियामधील डॉ.सुकोलॉफ आणि पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर दक्षिण कोरियामधील डॉ.ली हे सात दिवसांचे विशेष सत्र घेणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ. आर.के. कामत यांनी परिचय करून दिला. सौ. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्राडी विभागप्रमुख पी.टी. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. जी.एस. कुलकर्णी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment