Monday 12 March 2018

अहिल्यादेवी होळकर अतिशय मुत्सद्दी, धोरणी आणि कणखर - डॉ.चंद्रकांत अभंग




शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यान प्रसंगी (डावीकडून) डॉ.निलीशा देसाई, डॉ.निलांबरी जगताप, प्राचार्य डॉ.ए.बी.राजगे, डॉ.एन.डी.पारेकर, डॉ.चंद्रकांत अभंग.
कोल्हापूर, दि.१२ मार्च - माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या अहिल्यादेवी होळकर अतिशय मुत्सद्दी, धोरणी, उत्तम प्रशासक आणि कणखर भूमिका घेणा-या तत्वज्ञानी राणी होत्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.चंद्रकांत अभंग यांनी केले. 
          शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन, सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि छत्रपती शाहूमहाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'राजमाता अहिल्याबाई होळकर-जीवन कार्य' या विषयावर दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामध्ये करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्धाटन प्रसंगी उद्धाटक प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रकांत अभंग बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.बी.राजगे उपस्थित होते. 
डॉ.चंद्रकांत अभंग
            डॉ.चंद्रकांत अभंग पुढे म्हणाले, खंडेराव होळकर 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईमध्ये धारातीर्थ पडल्यानंतर सासरे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून रोखले, त्यांचे मतपरिवर्तन केले. प्रशासकीय सैन्याच्या कामात त्यांना मल्हारावांनी निपूण केले हाते. 1754 नंतर अहिल्याबाई रसद पुरवठा अधिकारी म्हणून कार्य केलेल्या आहेत. नोव्हेंबर 1761 मध्ये मांगरुळ भकवाडा येथील आठ गांवे आपल्या ताब्यात यावी म्हणून लढाई सुरुवात झाली. अहिल्यादेवी तातडीने तोफा, बैला अन्य युध्द सामग्री पाठविण्याचे व्यवस्थापन केले. रामपुरा, भांडपुरा या भागामध्ये तोफांचे कारखाने उभारले गेले होते. अहिल्यादेवींच्या जीवनातील जास्तकाळ रामपुरा, भांडपुरा या गांवात गेल्याचे दिसून येते. अहिल्यादेवीकडे सैनिकीपोषाखामध्ये स्त्रीयाही होत्या.  राघोबांनी ज्यावेळेस अहिल्यादेवींवर आक्रमणाची तयारी केली त्यावेळेस इतर मराठा सरदारांनी अहिल्यादेवींचा पक्ष घेतला आणि रोघोबांना माघारी फिरावे लागले. महादजी शिंदे, तुकोजी हे समवयस्क असूनही अहिल्यादेवींना मातोश्री म्हणून संबोधत होते. इंग्रजांच्या धोक्याकडे लक्ष वळविण्याचे मोठे काम अहिल्यादेवींनी  केलेले होते.  लाखोरीच्या युध्दाअधी भारताच्या इतिहासामध्ये युरोपीयन पध्दतीने झालेले त्या पहिल्या युध्दामध्ये शिंदेचा विजय झाला होता. यावेळीही अहिल्यादेवींची दूरदृष्टी कामी आली होती. अहिल्यादेवींनी उत्तर, पूर्व, पश्चिम भारतामधील निरनिराळया ठिकाणच्या नदीघाट आणि मंदीरे येथे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहेत. हे त्यांचे कार्य लक्षात घेण्यासारखे आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचा धर्म अहिल्यादेवींनी भारतभर वाढविलेला आहे, हे आपल्याला दिसून येते.
शेतीच्या कामामध्ये परिवर्तन करणे, भिल्लांना राज्यव्यवस्थेमध्ये सामावून घेण्याची दखल त्यांनी घेतली.  महेश्वर या ठिकाणच्या नदीघाट मंदिरांचे काम जवळ जवळ 20 ते 30 वर्षे सुरु होते. यामाध्यमातून तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होत होता.  महेश्वरमध्ये अहिल्यादेवींनी महाराष्ट्रपध्दतीचा किल्ला निर्माण केला. अहिल्यादेवींनी गुजरात मधून विणकर आणले त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला त्यामुळे महेश्वरीसाडीची ख्याती संपूर्ण भारतभर निर्माण झाली. महाराष्ट्र राज्याबाहेरही मराठयांचे फार मोठे कर्तुत्व होते.  अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली व्यवस्था निर्माण केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. ए. बी. राजगे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिध्द होत्या. अहिल्यादेवींनी अनेक मंदिरे नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोध्दार केला. महेश्वर इंदूर या गावांना त्यांनी सुंदर बनवले. अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. कारागीर, मूर्तिकारांना त्यांनी सन्मान दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.एन.डी.पारेकर, कार्यक्रमाचे संयोजक डॉ.निलांबरी जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संयोजक डॉ.निलीशा देसाई यांनी आभार मानले. डॉ.अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी यशपाल धिंडे, विनयाताई करपेकर, दशरथ पारेकर, डॉ.अवनिश पाटील, श्रीमती छाया राजे यांचेसह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment