Wednesday 3 January 2018

शांतता, सौहार्द प्रस्थापनेसाठी मूल्यशिक्षण आवश्यक: डॉ. विलास नांदवडेकर



मूल्यशिक्षण कार्यशाळेत बोलताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. ए.एम. गुरव, डॉ. लेसन आझादी, डॉ. शशी गायकवाड.


Dr. A.M. Gurav

विद्यापीठात मूल्यशिक्षण कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: समाजात शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र व बहाई अकादमी, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी मूल्यशिक्षणविषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात कार्यशाळा झाली. यावेळी बहाई अकादमीचे डॉ. लेसन आझादी व डॉ. शशी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीतील मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, महात्मा गांधी यांची मूल्यशिक्षणावर नितांत श्रद्धा होती. भारतीय समाजात मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ते आग्रही होते. आज प्रत्येकजण कोणत्याही मूल्यांपेक्षा पैसा या मूल्याच्या अधिक पाठी लागल्याचे दिसत आहे. पण, अखेरीस जीवनात शांती हवी असेल, तर नैतिकता आणि मानवी मूल्यांचेच स्थान सर्वोच्च आहे. हे मूल्यशिक्षण एका दिवसात निर्माण होणारी बाब नाही. शिक्षण व्यवस्थेत प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवात करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती करता येणे शक्य आहे.
केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव म्हणाले, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे काम मूल्ये करतात. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मनुष्य विविध प्रकारच्या पर्यावरणातून वाटचाल करतो. हे सारे पर्यावरण त्याच्यातील मूल्यव्यवस्थेला आकार देण्याचे काम करते. नैतिक, सामाजिक, भौतिक, वैश्विक अशी वैविध्यपूर्ण मूल्ये मानवात सामाजिक जाण आणि भान निर्माण करतात. जीवनाचे स्वरुप पालटून टाकण्याचे काम मूल्ये करतात. जीवनात योग्य आणि समाजोपयोगी कामे करणे म्हणजेच मूल्ये होत. या मूल्यांच्या अंगिकारातूनच जीवनात आनंद व समाधानाची निर्मिती होत असते.
यावेळी डॉ. आझादी आणि डॉ. गायकवाड यांनी मूल्यशिक्षणाच्या संदर्भात बहाई अकादमी करीत असलेल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. डॉ. एस.डी. कोरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment