Thursday 23 March 2017

सर्वच विषयांच्या अध्यापनासंदर्भात नव्याने विचार करण्याची गरज: नागनाथ कोत्तापल्ले


डॉ. रवींद्र ठाकूर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


डॉ. नागनाथ कोत्तापल्ले


डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मराठी विभागात राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर, दि. २३ मार्च: सध्या ज्ञानाचा गतिमान पद्धतीने विकास होतो आहे. या परिस्थितीत केवळ मराठीच नव्हे, तर सर्वच विषयांच्या अध्यापनासंदर्भात नव्याने विचार व मांडणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयीन स्तरावरील मराठीचे अध्यापन या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सद्यस्थितीत ज्ञानविस्तार हा प्रचंड गतीने आणि अनेक दिशांनी होतो आहे. सर्व ज्ञानशाखा परस्परांशी सम्मिलीत होऊन त्यातून पुन्हा नवीन ज्ञानशाखा उदयास येत आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक अभ्यासक्रम आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षकांनी अडकून राहता कामा नये. नव्या ज्ञानाचा, त्याच्या विस्ताराचा आवाका लक्षात घेऊन स्पेशलायझेशनबरोबरच अन्य विद्याशाखांमधील ज्ञानाचा आधार घेऊन आपल्या विषयाशी त्याची सांगड कशा पद्धतीने घालता येईल, याचा अभ्यास शिक्षकांनी करण्याची गरज आहे.
मराठी हा विषय केवळ या विषयाच्या शिक्षकांपुरता मर्यादित नसावा, अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ज्ञानव्यवहाराची भाषा व्हावी, असे जोपर्यंत प्रत्येकाला वाटत नाही, तोपर्यंत तिचा विकास होणे अशक्य आहे. ही भाषा माझी आहे, असे लोकांना का वाटत नाही, याविषयीचे चिंतनही करणे आवश्यक आहे. भाषेला अस्मिता, अहंगंडाची पुटे चढविणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
मराठी विभागाने केलेल्या या सत्कार समारंभामुळे आपण अत्यंत भावनाविवश झाल्याचे सांगून डॉ. ठाकूर म्हणाले, मराठीसह अन्य भाषा विषयांबाबत वाढते औदासिन्य चिंताजनक आहे. काळाच्या मागण्या सातत्याने बदलताहेत, त्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आणि त्यांना सामोरे जाणारी पिढी घडविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनव्यवहारात आपण मराठीचा संपूर्ण वापर करणार आहोत की नाही, हा कळीचा प्रश्न आहे. जगभरातले ताजे ज्ञान मराठीत यावयाचे असेल तर, त्याचा तत्काळ अनुवाद करून विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना देण्याची मोठी गरज आहे. मात्र, त्यासाठी अनुवादित साहित्याकडे पाहण्याचा आपला कलुषित दृष्टीकोन बदलावा लागेल. त्याचप्रमाणे भाषासमृद्धीसाठी समीक्षेवर आधारित अभ्यासक्रमाऐवजी सर्जनशील लेखनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आईइतकाच सन्मान मातृभाषेलाही देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात अन्य संस्थानिक, राजे अरबी, ऊर्दू, फारसी भाषांच्या प्रभावाखाली असताना आपला पत्रव्यवहार मराठीतून करण्यास प्राधान्य दिले. हे मराठी भाषेला महाराजांचे फार मोठे योगदान आहे. हा आदर्श समोर ठेवून आपण मराठीतून व्यवहारास प्राधान्य द्यायला हवे. त्याचप्रमाणे मराठीच्या अध्यापनाविषयी चर्चा करीत असताना वाङ्मयीन समीक्षेबद्दलही सांगोपांग विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. ठाकूर हे अत्यंत मृदुभाषी, शांत व सुस्वभावी अध्यापक आणि तितक्याच ताकतीचे सृजनशील लेखक असल्याचे कौतुकोद्गारही त्यांनी या प्रसंगी काढले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्याचा विभागाचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही मत कुलगुरूंनी व्यक्त केले.


यावेळी डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते डॉ. रवींद्र ठाकूर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवकुमार सोनाळकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह मराठीचे महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 15 March 2017

परदेशी लाभार्थी विद्यार्थ्यांनी भारतीय उच्चशिक्षणाचे ब्रँड ॲम्बेसॅडर बनावे: महंमद अली ओस्मान



नवी दिल्ली येथील केनिया हाय कमिशनचे एज्युकेशन कौन्सिलर महंमद अली ओस्मान यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.



उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

प्रमुख पाहुण्यांसमवेत परिषदेस उपस्थित परदेशी विद्यार्थी.

कोल्हापूर, दि. १५ मार्च: शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्या देशात परतल्यानंतर या विद्यापीठाचे व भारतीय उच्चशिक्षणाचे ब्रँड ॲम्बेसॅडर बनावे, अशी अपेक्षा नवी दिल्ली येथील केनिया हाय कमिशनचे एज्युकेशन कौन्सिलर महंमद अली ओस्मान यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल अफेअर्स कक्षातर्फे गेल्या १० व ११ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद घेण्यात आली. या परिषदेत शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विविध देशांमधील ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परिषदेस संबोधित करताना श्री. ओस्मान बोलत होते. या वेळी परिषदेचे उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.
ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या इतकी असेल, याची कल्पना नव्हती. या परिसरातील शिक्षणाची परंपरा आणि आस्था पाहून मी भारावून गेलो आहे. शिवाजी विद्यापीठासह एकूणच भारतीय उच्चशिक्षण परंपरेबद्दल माझ्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे. परदेशी विद्यार्थ्यांना, विशेषतः केनियासारख्या देशांतल्या विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण या ठिकाणी दिले जाते आहे. याचा लाभ घेऊन मायदेशी परतल्यानंतर तेथील भावी विद्यार्थ्यांनाही त्यांनी योग्य मार्गदर्शन करावे आणि भारतात उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. या दोन देशांदरम्यान संवादाचा पूल विद्यार्थ्यांनी उभा करावा. त्याचप्रमाणे भारतात शिक्षण घेत असताना आपल्या देशाचा लौकिकही येथे वृद्धिंगत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय समन्वयन कक्षातर्फे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची परिषद आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, हे सारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाचे ब्रँड ॲम्बेसॅडर आहेत, ही बाब खरी आहेच. पण, त्याचबरोबर स्थानिक पालक या नात्याने त्यांच्याशी सुसंवादाचा पूल प्रस्थापित करणे आणि त्यांच्या समस्या, प्रश्न समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देणे, ही बाब अशा परिषदांतून शक्य होते. विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
परिषदेत पहिल्या दिवशी चार विविध सत्रांत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, चर्चा व अनुभव कथन आदी कार्यक्रम घेण्यात आले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध ठिकाणांना अभ्यास भेटी आयोजित करण्यात आल्या. परिषदेत केनिया, झांबिया, बुरुंडी, तांझानिया, युगांडा, दक्षिण सुदान, सोमालीया आणि सुदान या देशांतील विद्यार्थी सहभागी झाले.

सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संख्याशास्त्राचा वापर आवश्यक: प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी



उपयोजित संख्याशास्त्र राष्ट्री परि शिवाजी विद्यापीठात उत्साहात
  
कोल्हापूर, दि. १५ मार्च: संख्याशास्त्र विषयाचा उपयोग समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागामार्फत उपयोजित संख्याशास्त्र (अप्लाईड स्टॅटिस्टिक्स) या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिदेत ते बोलत होते. यावेळी कोलकता येथील आय.एस.आय. संस्थेचे प्रा. आशिष सेनगुप्ता प्रमुख उपस्थित तर, अधिविभाग प्रमुख प्रा. डी.एन. काशीद अध्यक्षस्थानी होते.
गणित विभागाच्या रामानुजन सभागृहात झालेल्या या परिषदेस संबोधित करताना प्रा. रट्टीहळ्ळी म्हणाले, संख्याशास्त्र हा विषयच मुळात सामाजिक उपयोजनाचा आहे. संख्याशास्त्रीय विश्लेषणाचे दूरगामी लाभ समाजाला होत असतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ध्येयधोरणांची आखणी व निश्चिती करण्याच्या कामी संख्याशास्त्राचे योगदान अमूल्य असते. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करताना अभ्यासकांनी त्याकडे एक सर्वंकष समाजोपयोगी शास्त्र या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. पीएच.डी.सारखे उच्चशिक्षण घेतल्यानंतरही या संशोधनाचा ओघ संशोधकांनी थांबविता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी डॉ. आशि सेनगुप्ता यांनी डिरेक्शनल स्टॅटिस्टिक्स फॉर बीग डेटा सायन्स या वियावर मार्गदर्शन केले. प्रा. डी. टी. शिर्के यांनी एम. एस्सी. अप्लाईड स्टॅटिस्टिक्स हा यु.जी.सी च्या ईनोव्हेटिव्ह प्रोग्र अंतर्गत अधिविभागात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. डॉ. एस. बी. महाडि यांनी प्रास्ताविक केले.  डॉ. एच. व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. डी.एम. सकटे यांनी त्रसंचालन केले. 
परिषदेत आमंत्रित व्याख्याते डॉ. एस.व्ही. भट, प्रा. एस.बी. मुनोळी (कर्नाटक विद्यापीठ, धारवाड), प्रा. पी. व्ही. पंडीत (बेंगलोर विद्यापीठ, बेंगलोर), प्रा. टी.व्ही. रामनाथन (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांचे व्याख्यान झाले.  विविध विद्यापीठे महाविद्यालयातील बारा संशोधकांनी शोधनिब सादर केले.